Sakshi Sunil Jadhav
रोजची पोळी भाजी खाऊन कंटाळला असाल तर अंबाडीच्या पानांच्या पातोड्या नक्कीच ट्राय करा. ही रेसिपी बनवायला सोपी आणि पौष्टिक आहे.
दहा ते बारा अंबाडीची मोठी पानं, २ कप बेसन, १ चमचा तांदळाचं पीठ, १ चमचा धणे जिरे पूड, १ चमचा तीळ, हिंग, १ चमचा गूळ, मोहरी जिरं, कढीपत्ता, मीठ, तेल इ.
सर्वप्रथम अंबाडीची पानं तयार करून घ्या. त्यासाठी अंबाडीची पानं स्वच्छ धुवून पुसून कोरडी करा.
आता पीठाचं मिश्रण तयार करा. त्यासाठी बेसन, तांदळाचं पीठ, मसाला, हळद, हिंग गूळ आणि मीठ मिक्स करून हळूहळू पाणी घालून सरसरीत मिश्रण करा.
एका पानावर मिश्रण पसरून त्यावर दुसरं पान ठेवा. अशाप्रकारे ४ ते ५ पानांचा थर लावून घट्ट गुंडाळी तयार करा.
आता गुंडाळी वाफेवर २० ते २५ मिनिटं शिजवून घ्या. शिजल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यात.
थंड झालेली गुंडाळी गोल आकारात कापून किंवा आवडीच्या आकारात कापून पातोड्यांचे तुकडे तयार करा.
कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, तीळ आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. त्यामध्ये पातोड्यांचे काप घालून हलके परतून घ्या. गरमागरम अंबाडीच्या पातोळ्या सर्व्ह करा.